Friday, August 3, 2012

सागरगड


सागरगड


  खुप दिवसानी 'सागरगड' (अलिबाग जवळचा) या पावसाळी ट्रेकला जाण्याच्या माझ्या हाकेला मित्रांची साद मिळाल्यानतंर आम्ही  रविवारी ५ सप्टेंबर,२०१० गेलो होतो. सागरगडला जाण्यासाठी प्रथम अलिबागची एसटी पकडायची. तर अलिबागच्या अलीकडेच पाच किमी अंतरावर खंडाळे गाव आहे. या स्टॉपवर उतरायचे. इथेच गावाच्या नावाची हिरवी पाटी दिसेल. तर डाव्या हाताने जो रस्ता जातो त्या वाटेने तडक चालत निघायचे. काही नवखे आले होते तर काही गणपतीच्या तयारीसाठी घरीच राहीले.हिरवाईचा साज नटलेला निसर्ग पाहुन मन उल्हसित झाले..ऊनपावसाचा खेळ सुरु होता.पाउस येवून गेल्यावर निसर्ग स्वच्छ घुतल्यासारखा दिसायचा.पावसाने आम्हाला चागंली साथ दिली.सुरुवातीला उत्साह असल्याने आमचे मावळे जोरात होते.मागच्या आठवड्यात माझा वाढदिवस होता.मुलाच्या मित्रानी तो (बिलेटेट्)वाढदिवस पुन्हा माझ्याकडुन केक कापुन साजरा केला. बाजुला वाहणारा वाहल,  कातळाचा टेबल, हिरवा निसर्ग,  लाबंवर दिसणारा घबघबा, क्षांची किलबील,पाण्य़ाची खळखळ अशा सजावटीत माझा वाढदिवस साजरा होण्याची ही पहिलीच वेळ होती.खुपच आनंद झाला आणि स्मरणीय ठरला.    



   डांबरी सडक संपून उजव्या हाताला दगडाचा कच्चा रस्ता निघतो तो थेट गड पायथ्याशी जातो. पायथ्यालाच दगडाच्या पाय-या आहेत. छोटी चढ चढुन गेल्यावर सिद्धेश्वर आश्रमाचा शांत निगर्सरम्य परिसर तर धोंडाणे धबधबा आणि गुहा पहायला मिळतात. नागमोडी चढनीच्या वाटा चढताना चांगलीच दमछाक होते, पण सिद्धेश्वरच्या या हिरव्यागार परिसरात येऊन सर्व थकवा नाहिसा होतो. शिवमंदिरात जाउन दर्शन घेतले.मठात फिरलो.मंदिरासमोरच गोड्या पाण्याची विहीर आहे. इथे बारमाही पाणी असते.तेव्हा थोडं पाणी पिऊन जास्त विश्रांती घेता मंदिरासमोरच्या वाटेने गडाच्या दिशेला निघावे लागते. आणखी थोडं पुढे गेल्यावर सागरगड वाडी लागते.गावांत सोलार उर्जेवरची वीज लावली आहे.

 या ठाकर वस्तीतून पूवेर्कडे चालत गेल्यावर समोरच सागरगडाचा पाहारेकरी 'वानरलिंगी' सुळका दृष्टीस येतो. पण घुक्यात हरवलेला होता.थोड्याच वेळात थोडे घुके बाजुला सरले आणि आम्हाला 'वनारटोक' दिसले. 
    डाव्या हाताला घनदाट जंगल आणि उजव्या हाताला खोल दरी, अशा वाटेने सागरड दुरूनही व्यवस्थित न्याहळता येतो. समुदसपाटीपासून साधारण ३५० मीटर उंचावरचा हा गड चांगला प्रशस्त आणि मोक्याचा होता, हे लक्षात येत गडाची तटबंदी बऱ्याच अंशी ढासळलेली आणि खचलेली आहे. तर गड बांधकामासाठी काही ठिकाणी जांभ्याच्या दगडांचा वापर केलेला दिसतो. गडावर फिरण्यासाठी तटबंदीच्या बाजूने जाणा-या मुख्य पायवाटेचा वापर करायचा. प्रथमच डाव्या हाताला पत्र्याचं छप्पर असलेले महादेवाचं मंदिर दिसते. इथूनच पुन्हा खाली उतरून उजव्या हाताला पाण्याचं कुंड दिसते.या कुंडाचं विशेष म्हणजे इथे भर उन्हाळ्यातही गोमुख असलेला पाषाणातून सतत पाणी पडत दिसते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने कुंडात कचरा न टाकता पाणी घ्यावे. हीच वाट पुढे वानरटोक सुळक्यासमोर जाते. वाटेत जुन्या वाड्याचे अवशेष आणि पाणी नसलेला छोटा तलावही दिसतो. तर काही समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाचीवर मात्र दाट जंगल आहे. तर अनेक वाड्याचे चौथारेच पाहायला मिळतात. पठार मोठे आहे.सागरगडावर निसर्गाच्या मोहात पडून इंग्रज अधिक-यांनी इथे वास्तव्यासाठी बंगले बांधले होते.येथुन अलिबागचा समुद्रकिनारा दिसतो. समुद्रातील बेटे पाहण्यास मिळतात.पुर्वेला घरमतरची खाडी आहे.कर्नाळा,मानिकगड दिसतात.


    वानरटोकावरुन दिसणारे द्दश्य पाहुन तेथेच जेवण करण्याचे ठरवले.प्रथम फोटोग्राफि झाली.आणलेले डब्बे उघडले आणि वा-यासह पावसाने सुरुवात केली त्यामघ्ये आमचे वनभोजन त्यामघ्ये वाहुन गेले. पण त्या परीस्थितीतही जेवणाची मजा वेगळीच आली.पँकअप करुन आम्ही परतीला सुरुवात केली.घुके वाढल्याने वाट शोघत शोघत वाटचाल सुरु होती.ऐकामेकाला साद घालत उतरत होतो.पावसाचा जोर वाढला होता. पटापट उतरत खाली आल्यावर 'धोंडाणे'धबधब्यावर आलो.शभंर फुटावरुन पडणारा शुभ्र फेसाळ पाण्याचा प्रवाह खाली अंगावर घेत सर्वानी आपला थकवा दुर केला.मित्रमडंळी तेथुन बाहेर येण्यास तयार नव्हती पण पावसाने आपला जोर वाढवल्याने सर्वाना बाहेर काढावे लागले.तेथे फक्त आम्ही असल्याने सर्वानी मनमुराद आनंद घेवुन तेथुनच सागरगडाचा निरोप घेउन खाली आलो. 

चारही दिशांनी निसर्गाने परिपूर्ण अशा इतिहासाच्या मूक साक्षीदाराला एकदा तरी आवर्जून भेट द्या. 

No comments:

Post a Comment