Monday, October 8, 2018

नळदुर्गाची भुरळ



                                           महाराष्ट्र टाइम्स पूरवणी ( दि. ०८.१०.२०१८ )
















                                            ऐतिहासिक नळदूर्ग किल्ला

  पाऊस गेल्यानंतर उकाड्यामुळे गडांवर न जाता भुईकोट किल्ल्यांकडे जाण्याचे ठरले व नळदुर्गाची मोहिम ठरली.  

भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र राज्यात भुईकोट किल्ले, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग असे तिन्ही प्रकारातील किल्ले आढळतात.नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे.नळदूर्ग किल्ल्याचं संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला.त्याच्या नावावरुन या किल्ल्यास नळदुर्ग हे नाव रुढ झाले.नरमादी धबधबा ही उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्याची विशेष ओळख आहे.नळदूर्ग हे सोलापूर पासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे.सोलापूर -हैदराबाद रस्त्यावर नळदुर्ग गावामध्ये हा किल्ला आहे.

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगत असताना नळ राजा आणि दमयंती राणीचा इतिहास सांगितला जातो. हा किल्ला काही काळ ‘चालुक्य’ राजाकडे होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. त्यानंतर हा किल्ला विजापूरची आदिलशाही, मुघलशाही आणि निजामशाही यांच्याकडे आला. किल्ल्याचे बांधकाम आदिलशाहीच्या कालावधीत करण्यात आले.

नळदूर्ग किल्ल्याची जवळ जवळ ३ किमी लांबीची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे. या तटबंदीत एकूण ११४ बुरुज आहेत. या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज इत्यादी नावे आहेत.

मुख्य किल्ला आणि रणमंडख हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत.नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातून बोरी नदी वाहते. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे.या पाणी महलामध्ये नर व मादी हे दोन कृत्रिम धबधबे तयार करण्यात आले आहेत. हे धरण व महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे. पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरुन पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते.यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे.
स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना असलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ आहे. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार,रणमंडळ ,हत्तीखाना, किल्लेदाराचा वाडा,जामा मशीद,नऊ पाकळ्यांचा बुरुज किंवा नवबुरुज,बारदरी,रंग महाल,पाणी महाल,उपळ्या बुरुज अशी नळदुर्ग किल्ल्यावरील प्रमुख पहाण्यासारखी ठिकाणे आहे. 

 किल्ल्याच्या बाहेरील बाजूने पाहिल्यानंतर,नवबुरुज कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. 
 उपळ्या बुरुजावरुन संपूर्ण किल्ल्याचा आणि सभोवतीचा परिसर दिसत असल्याने या 
टेहाळणी साठी उपयोग होत असे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातील धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. नळदुर्ग किल्ला येथे असणाऱ्‍या बोरी नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा केलेली आहे. तसेच वॉटर स्पोर्टची सोयही उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयासाठी नळदुर्ग किल्ल्याच्या माहितीवर आधारित पाठ तयार केला आहे. नळदुर्ग किल्ला महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजने अंतर्गत  युनिटी मल्टिकॉन्स कंपनीस संगोपनार्थ दिले आहे.

इतिहासाची साक्ष असणाऱ्या या नळदुर्ग किल्ल्याला नक्कीच भेट द्यावी.

No comments:

Post a Comment