Tuesday, April 22, 2014

'एव्हरेस्ट'च्या इतिहासातील हा एक मोठा अपघात



जगातील सर्वोच्च शिखर 'एव्हरेस्ट'च्या इतिहासात आणि गिर्यारोहण जगात१८ एप्रिल हा दिवस 'सगळ्यात वाईट' ठरला. एप्रिलच्या मध्यावर हे गिर्यारोहक 'एव्हरेस्ट' शिखराकडे जाण्यासाठी रस्ता तयार (रूट ओपन) करतात. तो तयार करण्यासाठी २५ गिर्यारोहक निघालेले असतानाच शुक्रवारी पहाटे काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाटेतील 'खुम्बु आइस फॉल'चा अवघड टप्पा पार करत पुढे जात असतानाच शिखराच्या ऐन धारेवरून आलेल्या हिमप्रपाताने त्यांना कवेत घेतले. 



जगभरातल्या साहसी आणि तरुण गिर्यारोहकांत आजकाल हिमालयावर स्वारी करण्याचे वेड वाढत चालले आहे. एकतर शिखरे सर करण्याचे कसब वाढत आहे आणि हौसही वाढत आहे. ही वाढती गर्दी म्हणजे नेपाळसाठी उत्पन्नाचे साधन झाले आहे. नेपाळची उत्पन्नाची साधने फार मर्यादित आहेत. त्यामुळे नेपाळचे सरकार गिर्यारोहणाला प्रोत्साहन देत असतात. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली अशा अनेक देशातले गिर्यारोहक तिथे येत आहेत. त्यांच्या सोबत शेर्पाही जातात. त्यांनाही काम मिळते. यातल्या काही शेर्पानी ही शिखरे अनेकदा सर केली आहेत. हिमभ्रमण आणि गिर्यारोहणात कितीही तांत्रिक प्रगती झाली तरी हिमालय व शेर्पा यांचे अजोड नाते कायम राहणार आहे.माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या शतकभरात जेवढ्या मोहिमा पार पडल्या, त्या सर्व मोहिमांचा खरा आधारकणा शेर्पा हाच होता. 


जवरच्या इतिहासात, एव्हरेस्टच्या वाटेने किमान २५० गिर्यारोहकांना पोटात घेतले आहे. १९२२मध्ये एव्हरेस्ट सर करण्याची पहिली मोहीम झाली, तेव्हाही सात शेर्पांना प्राण गमवावे लागले होते. मात्र, १२ शेर्पांचे प्राण हिरावणारा हा आजवरच्या एव्हरेस्ट मोहिमांच्या इतिहासातला सर्वांत मोठा अपघात आहे. १९ हजार फूट उंचीवरच्या खुंबू हिमनदीजवळ हा अपघात झाला. हा सगळा परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो. हिमकडे कोसळू लागले की, गिर्यारोहकांना कित्येक तास खोळंबून राहावे लागते. मोहिमा रद्दही कराव्या लागतात. 


एव्हरेस्ट हे जगातले सर्वात उंचावरचे शिखर. तिथे कधी तरी एखादा माणूस पोहोचायचा पण आजकाल तिथेही गर्दी व्हायला लागली आहे. माणसांचा वावर वाढला की, उष्णता वाढते आणि असे अपघात होतात, असे मानणारांचाही एक वर्ग आहे.

सध्या दरवर्षी सुमारे ३०० गिर्यारोहक एव्हरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करतात. ही संख्या सतत वाढत गेल्याने विरळ हवेतही नैसर्गिक श्वसन करू शकणाऱ्या, काटक व चिवट अशा शेर्पांची मदत जगातल्या गिर्यारोहकांना लागते. त्यामुळे, मोसम सुरू झाला की शेर्पांचे काम खूप वाढते. शेर्पा हे शूर व हवामान अंदाजाबाबत कमालीचे तरबेज असले तरी त्यांना धोका पत्करूनच या मोहिमा यशस्वी कराव्या लागतात. 


शेर्पा म्हणजे गिर्यारोहकांचे गाइड कम पोर्टर. यांच्या सहभागाशिवाय एकही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही.


या शेर्पाच्या अपघाती निधनाने  गिर्यारोहकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या कु‍टुंबीयाना
आपणही मदत केली पाहिजे.  



No comments:

Post a Comment