Saturday, April 4, 2015

निसर्गशिल्प ...सांधण व्हॅली


दि. ४ एप्रिलच्या ’ प्रहार ’ या वृतपत्रात ’निसर्गशिल्प ...सांधण व्हॅली’ हा माझा
लेख प्रसिध्द झाला आहे.







निसर्गशिल्प ...सांधण व्हॅली





लाखो-हजारो वर्षे तो ऊनवारा व पावसाचे तडाखे सह्याद्रीतल्या कातळावर, डोंगरदऱ्यांवर, पठारांवर बसतात. हे तडाखे वर्षांनुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना. कधी कोकणकडय़ाचे रौद्र रूप,तर कधी साहसाला साद घालणारे सुळके, तर कधी रांजण खळगे. ही शिल्पकला घडतेच मुळी डोंगरकपाऱ्यात.निसर्गाची ही अशी अद्भुते पाहायची असतील, तर मात्र वाट थोडी वाकडी करण्यावाचून पर्याय नसतो.असेच अनोखे निसर्गशिल्प आपल्या सह्याद्रीत दडलेले आहे. भंडारदरा जवळील ’सांधण व्हॅली’ पाहल्यानंतर निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे याची प्रचिती येते.






मातीचा जराही स्पर्श नाही की रस्त्याशी संबंध नाही... मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत आणि त्यावरून उड्या मारत पुढे जायचं... सोबतीला उंच, उभाच्या उभा काळाकभिन्न कातळ... या कातळभिंतींची उंची इतकी आहे की सूर्यकिरण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाहीत. 







त्यामुळेच तिथे सावल्यांच्या विविध छटा आणि प्रकाशाचे खेळ प्रत्येक वळणावर दिसतात. तसेच डोंगराच्या कुशीत उगम पावणाऱ्या धबधब्याच्या मार्गाने चालायला सुरूवात करून थेट नदीपर्यंत जाण्याचा अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा आहे! हे वर्णन आहे सांधण व्हॅलीचे.





ही व्हॅली म्हणजे चकित करणाऱ्या अनेक गोष्टी,सावल्यांचा खेळ आणि थरार यांचा खजिनाच आहे. 






मुंबई - इगतपुरी - घोटी - शेंडी (भंडारदरा) - पांझरे - उडदवणे - साम्रद गाव या मार्गाने सांधण व्हॅली जवळ पोहचता येते.









एकीकडे रतनगड, लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग,त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे अलंग,मदन,कुलंगसारखे अभेद्य किल्ले,चहूकडे जंगल असलेल्या मोठ्या पठारावर वसलेले इनमीन शंभरेक घरांचे सांधण व्हॅली जवळचे साम्रद हे गाव.सांधण व्हॅली मुळे हे गाव जगाच्या नकाशावर आले आहे.








गावातून बाहेर पडल्यावर कातळाच्यासड्यावरून पुढे जात वाट दाट झाडीत शिरते.थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी येतो. सांधण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे.







अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे.जो कधीही आटत नाही. 






दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ व थंडगार पाणी पिण्य़ास योग्य आहे.घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला.







   आत दरी सापासारखी लांबच लांब वळण घेताना दिसते.दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केलेली आहे.या धळीच्या प्रथमदर्शनीच आपण प्रेमात पडतो. 






त्याचे राकट स्वरूपच भुरळ घालते.आपण आपसूकच पुढे जात राहतो.वाटेत मात्र जपून पावले टाकावी लागतात,कारण काही मोठमोठे दगडधोंडे व शिळा ओलांडाव्या लागतात.पहिला कातळटप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला जातो.त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आपणास कौशल्याने मार्ग काढत पलीकडे जावे लागतो. एव्हाना आपण बऱ्यापैकी आत गेलेले असतो.नजर उंचावून पाहिली की लक्षात येते,आपण थेट डोंगराच्या मधोमध खोदलेल्या भेगेत आहोत.ही भेग तर केवढी, ४५०-५०० फूट खोल, फार फार तर २५ फूट रुंद, कधी कधी १० फूटदेखील आणि एक किलोमीटर लांबीची आहे.परत आपला मार्ग दुसर्‍या मोठ्या पाणसाठयाने अडवला जातो. 






सुर्याची किरणे येथे कधीही पोहोचू शकत नसल्याने येथील अतिशय थंडगार अश्या त्या कंबरभर पाण्यातून लांब चालण्याचा थरार प्रत्यक्ष अनूभवातूनच येतो.काहीवेळा छातीपर्यंत पाणी असल्यमुळे बॅगा डोक्यावर घेण्यावाचून गत्यंतर नसते.डोंगराच्या पोटातील आपला प्रवास चालूच ठेवायचा. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.








    आता हा व्हॅली रुंद होत जाते. तसा त्याचा उतारदेखील वाढत जातो. म्हणजे मग डोंगरकडय़ाजवळ आलो असे समजावे. तेव्हा समोर पुन्हा सह्याद्रीचे रौद्र स्वरूप आपल्या स्वागताला हजरच असते.भन्नाट वारा अंगावर झेलत मागे वळून पाहिले की, ती व्हॅली अंगावरच येते असते वाटते. ह्या व्हॅलीतून पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळतो. व्हॅली उतरून साकुर्ली गावात यायचे.त्या गावातून दहाएक मिनिटांवर डेहणे गाव आहे.या गावातून आसनगाव बस किंवा खासगी वाहन मिळते. 








      अप्रतीम अश्या ह्या निसर्गचमत्काराने आपण अवाक होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यामुळे तेथे कायमच सुखद गारवा असतो.                                                                                










पावसाळ्यात ह्या व्हॅलीत शिरण्याचा मार्ग बंदच असतो. पाऊस सरला की नोव्हेंबरच्या दरम्यान हा मार्ग खुला होऊ लागतो.सांधण व्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे, अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या गावकर्‍याला सोबत घ्यावे. 








खडगं, पाणी व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणार्‍या प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील दरीत एकट्याने जाणे टाळावे.










No comments:

Post a Comment