Saturday, September 26, 2015

ऐतिहासिक पुरंदर किल्ला


२६ सप्टेंबरच्या ’ प्रहार ’ या वृतपत्रात माझा ऐतिहासिक पुरंदर किल्ला हा लोख प्रसिध्द झाला आहे. 



                                      येथे क्लिक करावे ==>>  ऐतिहासिक पुरंदर किल्ला







                                            ऐतिहासिक पुरंदर किल्ला



इतिहासाच्या खूणा जपलेला पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे.पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे.शूरवीर मुरार बाजी देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा बोलका साक्षीदार असलेलापुरंदर किल्लापुरंदर आणि वज्रगड किल्ला हे दोन्ही किल्ले पूरंदर तालूक्यात वसलेले असुन ते एकमेंकांना जोडलेले आहेत.पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.काही वर्षे हा पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता. हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानीही होती. आता हा किल्ला मिलिटरीच्या ताब्यात आहे.त्यांची पर्यटकांवर करडी नजर असते.

 
पुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो.किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. तो ट्रेकिंगसाठी सोपा आहे.पुणे, हडपसर, सासवड, नारायणपूर किंवा पुणे-कापूरहोळ - नारायणपूर अशा दोन मार्गे या गडाकडे येता येते. यापैकी कुठल्याही मार्गाने आलो तरी पायथ्याच्या नारायणपूर आणि पुढे पेठ नारायण गावापर्यंत यावे लागते.







रस्त्याने किल्‍ल्‍यावर आल्यास मिलिटरीचे सैनिक आपली तपासणी करुनच आपल्याला गडावर प्रवेश देतात.बिनी दरवाजातून आपण पुरंदरमाचीवर प्रवेश करतो.त्या माचीला पूर्वी पाच दरवाजे असल्याचे मानले जाते. आता फक्त एक दरवाजा उरला आहे. गडाभोवती पूर्व-पश्चिम एक किलोमीटरभर फिरलेल्या त्‍या माचीवर अनेक वास्तू दिसतात. त्यातपुरंदरेश्वर-रामेश्वरची मंदिरे, पद्मावती-राजाळे तलाव, छोटे-मोठे आड, पेशवेकालीन इमारतीच्या जोत्यावर ब्रिटिशांनी बांधलेले बंगले, चर्च, बराकी अशा अनेक वास्तू आहेत. या वास्तूंमधून हिंडतानाच दोन्ही हातात समशेरी घेतलेला मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा समोर येतो.


पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. तो एका दिवसांत पाहून होणे कठिणच. किल्ला मजबूत असून शत्रूच्या आक्रमणापासून बचावाला उत्तम जागा हेरून बांधण्यात आला आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. पूर्वी दारुगोळा व धान्य यांचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. गडावर चढायला असलेली एक सोपी बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. पायथ्यावरून गडावर एका कच्‍च्‍या वाटेसह एक पक्का रस्ताही जातो. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.






क-हे पठाराच्या या काव्यात पुरंदर किल्ल्याचे असे सुरेख वर्णन केले आहे. पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच पुरंदरगड. पुराणात त्या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. इंद्राचे अस्त्र 'वज्र', म्हणूनपुरंदरचा सोबती असलेल्या  किल्‍ल्‍याला नाव देण्यात आले 'वज्रगड'!पुरंदर किल्‍ल्‍याच्या नावाविषयी एक वेगळी उत्पत्ती आहे. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. त्याचे मूळ नाव 'पूर'. त्या पूर गावाचा आधार म्हणून किल्‍ल्‍याला 'पुरंधर' आणि कालांतराने अपभ्रंशित होत 'पुरंदर' असे नाव पडले असावे.









पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेने दिलेरखानाला अखेरच्या‍ श्वासापर्यंत दिलेला लढा. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी १६६५ च्या आषाढातपुरंदरला वेढा घातला. मुघलांच्या अफाट फौजेला मुरारबाजी त्याच्या  मोजक्या मावळ्यांसह निकराची टक्कर देत होता. वज्रगड पडल्यानंतर मुरारबाजी निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेला. त्याने दिलेल्या लढ्याचे सभासदखानाच्या बखरीत रोमांचक वर्णन करण्यात आले आहे.त्यानंतर १९ जून १६६५ रोजी इतिहासप्रसिद्धपुरंदरचा तह झाला.








बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी मंदिर आहे. त्याचे नाव ‘पुरंदरेश्वर’.पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. ते पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वर गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी तो बांधला. त्या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. ती चांगल्या अवस्थेत आहे. तेथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते. दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या वाटेने वर गेल्यावर पंधरा मिनिटांतच पर्यटक दिल्ली दरवाजापाशी पोचतो.

या तिसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे कडा थेट गेलेला दिसतो, तोच तो खंदककडा. कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तिसऱ्या दरवाज्यापाशी यावे. तेथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजुबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. तेथेच अंबरखाना होता. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवरून पुढे गेल्यावर पाण्याचे हौद लागतात. वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. त्या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडीमुळे तो दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी त्या दरवाजाला फार महत्त्व होते.या वाटेने सरळ पुढे केदारेश्वराच्या मंदिराकडे जातो.हे मंदीर उंचीवर असल्याने येथून चारी बाजुचा परीसर व किल्ल्याचा  आवाका लक्षात येतो. या ठिकाणावरुन खुपसे गड दिसतात.

 










किल्ल्यावर झालेली पडझड पाहवत नाही. पुरंदर किल्ला संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे किल्ल्याचे किल्लेपण जतन करण्याचे काम त्यांनी करावे. या ठिकाणी सर्व सुविधा द्याव्यात.





गडावर जाताना मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्याची मिलिटरीची परवानगी नसल्याने फोटो  काढता येते नाहीत.तसेच याची वज्रगडावरही जाण्यास बंदी असल्याने विसर होतो.
 
हा ऐतिहासिक किल्ला पाहताना डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो. 








No comments:

Post a Comment