Thursday, August 3, 2017

आट वाटेवरचा मानगड




                आट वाटेवरचा मानगड 

०३.०८.२०१७  रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 


                                  इथे क्लिक करावे  ===>>        आट वाटेवरचा मानगड


















     ​किल्ले मानगड हा रायगडच्या प्रभावळीतील एक किल्ला. म्हणजे मुख्य किल्ल्याचा सहाय्यक गड.  छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून     निवड केल्यावर, युध्दशास्त्राच्या  दृष्टीने तो बळकट करण्यासाठी       रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणार्‍या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे कठीण झाले होते.गड लहान आहे पण वास्तुवैभव मोठे आहे.देवीचे मंदीर,प्रवेशव्दार,पाण्याचे टाके, कोठार किंवा गुहा ,खोदीव पाय-या, जोत्यांचे अवशेष व बुरुज आहेत. 






मुंबई - गोवा मार्गावरील माणगाव पासून मानगड १७ किमी अंतरावर आहे. माणगावहून बस किंवा रिक्षाने १० किमी वरील निजामपूर गाठावे. तेथून ४ किमी वर बोरवाडी मार्गे ३ किमी वरील मशिदवाडी या मानगडच्या पायथ्याच्या गावात जाता येते.  
रस्त्यावर  
मानगड’ 
असे फलक आपल्याला बरोबर गडाकडे 
घेउन जातात.  गावात येणारा डांबरी रस्ता जिथे संपतो,  या रस्त्याच्या टोकाला
एक पायवाट डावीकडे जाते. या पायवाटेने किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण खिंडीपर्यंत येतो. खिंडीत असलेल्या मंदिरामागून पायर्‍यांची वाट गडावर जाते.



 मानगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी पठारावर विंझाई देवीचे  कौलारू ​ 
मंदिर लागते. मंदिराच्या पाठिमागून गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पायर्‍या आहेत. 
पाय-या छोट्या खोबणीसारख्या आहेत.पावसाळ्यात या पाय-यांवर शेवाळ असल्याने दक्षता घेऊन वर चढावे.येथे बरेच निरसडे झालेले असते.
त्यानंतर किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार व त्याबाजूचे बुरुज अजून सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते. याची कमान पुर्णपणे ढासळलेली आहे. कमानीच्या एका तुकड्यावर ‘नागशिल्प’ कोरलेले आहे. या द्वारातून आत शिरल्यावर डावीकडे राहण्यायोग्य गुहा आहे. गुहेजवळच खांब टाके आहे. 






दुसर्‍या प्रवेशद्वारापासून एक वाट उजवीकडे ‘मानगड माची’ कडे जाते. माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली ६ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या आजूबाजूला चांगलेच गवत माजलेले आहे. हे पाहून पून्हा प्रवेशद्वारापर्यंत मागे येऊन तटबंदीच्या कडेने बालेकिल्ल्यावर जाता येते. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत. त्याच्या बाजूलाच उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.मागच्या बाजूला खाली दरीत पाण्याचे एक टाक आहे,ते पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेल्यावर, तेथे पाण्याची दोन टाकी पाहायला मिळतात.
पायथ्याच्या मशिदवाडी गावाचे; तसेच, मानगडाशेजारच्या कुंभ्या घाटाजवळच्या धन्वी शिखरांचे विहंगम दृश्य ध्वजस्तंभापासून दिसते.

 गडमाथ्यावर ध्वजस्तंभ असून त्याच्याजवळच पाण्याच्‍या दोन टाक्‍या आहेत. 
यातील पाणी पिण्यायोग्य आहे.मानगडच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे मोहक दृश्य दिसते वातावरण चांगले असल्यास रायगडचेही दर्शन होते. 

 मानगडची निर्मिती ही स्वराज्याची राजधानीचा उपदुर्ग म्हणूनच झाली असल्याने मानगड कायमच रायगडचा पाठीराखा म्हणून उभा ठाकला आहे. गडफेरी पूर्ण करून परत आल्या वाटेने खाली उतरायचे.काही वर्षापूर्वी ह्या गडाबद्द्ल कोणाला माहीती नव्हती. 



मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतल्यापासून हया गडाला प्रसिध्दि मिळाली.गडाच्या मूळ 
वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. संस्थेने संपूर्ण गडावर अवशेषांची दिशा दाखवणारे फलक बसवले आहेत.
‘दुर्गवीर’च्या सदस्यांना गडाच्या चोर दरवाज्याच्या बाजूला काम करत असताना काही पायऱ्या आढळून आल्या. त्यांनी उत्सुकतेने त्या भागातील माती दूर केल्यानंतर त्यांना जमिनीत पूर्णपणे गाडला गेलेला दरवाजा सापडला आणि मानगडाचे आणखी एक वास्तुवैभव प्रकाशात आले.




मानगड हा किल्ला म्हणजे वर्षभरात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही समयी भेट देण्याचा उत्कृष्ट पर्याय असून वर्षांकाळी हिरवाईने बहरलेल्या आणि ढगांच्या पुंजक्यात हरवलेल्या सह्याद्रीला आडवाटेवरून बघायचे असेल तर मानगडाला पर्याय नाही. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त दृष्टिसुख देणाऱ्या मानगड या सुंदर किल्ल्याला तर भेट द्यावीच,


No comments:

Post a Comment